लाठीमार नको; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पोलिसांना निर्देश


मुंबई : करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी आणि जमावबंदी लागू असतानाही विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांना पोलिसांनी अखेर कायद्याचा ‘दंडुका’ दाखविण्यास सुरुवात केली आहे. मात्र, बाहेर पडणाऱ्या लोकांशी सौम्यपणे वागा आणि त्यांच्यावर थेट लाठीमार करू नका, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.


करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारनं अनेक निर्बंध उपाय योजले आहेत. तसंच राज्यात संचारबंदी लागू केली आहे. या काळात कुणीही घराबाहेर पडू नका, असे आदेश आहेत. मात्र, तरीही काही लोक विनाकारण घराबाहेर पडत आहेत.


अखेर पोलीस यंत्रणेनं या लोकांना दंडुका दाखवण्यास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी नागरिकांना विचारपूस करण्याआधीच पोलिसांकडून चोप दिला जात असल्याचं व्हिडिओंमधून दिसून आलं आहे.


जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी यांनी यासंदर्भात राज्याचे मुख्य सचिव अजय मेहता यांच्याकडे तक्रार केली.


जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारे ट्रक अडवले जात आहेत. तसंच पेट्रोल पंपही बंद करण्यात आले असल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली.


पालघर येथे भाजीपाल्याची वाहतूक करणारे ट्रक अडवले जात आहेत. तसंच काही ठिकाणी पोलीस हे लोकांना चोप देताना व्हिडिओंमध्ये दिसत आहे. मेहता यांनी सचिवांसोबत झालेल्या आढावा बैठकीत या सर्व बाबी निदर्शनास आणून दिल्या. तसंच या संदर्भात मुख्यमंत्र्यांनाही माहिती दिली.