करोना –साथीला तोंड देण्यासाठी जन- आरोग्य अभियानचे आवाहन


जन आरोग्य अभियान, महाराष्ट्र

चीनमध्ये डिसेंबरमध्ये सुरू झालेली करोना ताप- खोकला – न्युमोनियाची साथ फारच वेगाने जगभर पसरली आहे. तीन महिन्यात दिडशेहून अधिक देशांमध्ये दोन लाखाहून जास्त लोक या साथीने आजारी पडून सहा हजारांपेक्षा जास्त दगावले आहेत. सर्व देशांचा अनुभव सांगतो की ही अतिशय वेगाने पसरणारी, असाधारण साथ आहे त्यामुळे असाधारण खास पावले उचलायला हवीत. त्यादृष्टीने जन स्वास्थ्य अभियान काही महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष वेधून काही सुचना आणि आवाहन जनतेला आणि सरकारला करत आहे.


चीनचा अनुभव सांगतो की कोरडा खोकला, जोरदार ताप व कधी कधी श्वास लागणे ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत. या आजाराचे कोव्हिड- १९ (COVID 19)हे विषाणू मारणारे औषध अजून सापडलेले नाही. नवीन औषध सापडून ते बाजारात यायला अनेक महिने लागतील. मात्र आपले शरीरच या विषाणूवर विजय मिळवते. आजारांपैकी ८०  टक्के रूग्णांना सौम्य आजार होतो व तापाची साधी पँरासिटमॉल गोळी, कोरडया खोकल्यावर साधे औषध, विश्रांती याने तो ७ ते १४ दिवसांमध्ये बरा होतो. १५ टक्के रूग्ण गंभीर होतात. त्यांना करोना- न्युमोनिया होतो. त्यांना इस्पितळात आणि त्यातील काही जणांना आय. सी. यू मध्ये उपचार करावे लागतात. एकूण रूग्णांपैकी सुमारे १ ते ३ टक्के रूग्ण दगावतात. ६० वर्षावरील रूग्ण,तसेच ज्यांना दमा, मधुमेह, उच्च रक्तदाब , हृदयविकार असे आजार असतील त्यांना तीव्र आजार होणे, दगावणे याचा धोका असतो. चीनमध्ये ९ वर्षाखालील कोणीही दगावले नाही आणि तरूण, निरोगी व्यक्तींमध्ये दगावण्याचे प्रमाण फारच कमी आहे. एकंदरीत स्वाईन – फ्लू सारखा  हा आजार आहे. मात्र संसर्गशीलता खूपच जास्त आहे. 


निरनिराळया देशांचा अनुभव सांगतो की परदेशातून आयात झालेली लागण ( आयात जन्य लागण ) हा या साथीचा पहिला टप्पा आहे. अशा रूग्णांच्या संपर्कात आलेल्यांना  झालेली लागण हा या साथीचा दुसरा टप्पा. तो ओलांडून इथल्याच समाजात, आपापसातील संपर्कातून पसरलेली लागण ( समाज जन्य लागण ) या तिस-या टप्यात या साथीने प्रवेश केला की, अतिशय वेगाने ही साथ पसरते. नोंदवलेल्या रूग्णांची संख्या पहिल्या दोन – तीन आठलडयांनंतर ५० – १०० च्या पुढे गेली की नंतरच्या आठवडयामध्ये ती फारच वेगाने वाढू शकते. उदा. अमेरिकेत ३ मार्च ते १४ मार्च या ११ दिवसात रूग्णांची संख्या ६४ वरून २८ पट म्हणजे १६७८ झाली . इटलीत २३ फेब्रुवारी ते ५ मार्च या ११ दिवसात ती ७६ वरून ४० पट म्हणजे ३०४८ झाली . तर १५ मार्च ती २५ हजार झाली. चीन, इटली , इराण इत्यादी काही देशात हे फारच वेगाने झाले . पण इतरही अनेक देशांमध्येही साथीने तिस-या टप्यात प्रवेश केला आहे. 


इटलीत आपल्यापेक्षा हॉस्पिटल्स ची क्षमता ( दर लाख लोकांमागे ) कित्येक पट आहे. पण तिथे आजच हॉस्पिटल्स, आय. सी. यु मधील खाटा अपु-या पडत आहेत. त्यामुळे भारतात इटली प्रमाणे या साथीचा समाज जन्य- प्रसार वेगाने झाला तर फारच अवघड होईल. भारतात ३० जानेवारीला पहिल्या केसची नोंद झाली आणि १५ मार्चपर्यंत १०७ जण आजारी व ३ मृत्यू अशी नोंद झाली आहे. आपण  तिस-या टप्याच्या उंबरठयावर उभे आहोत. भारतात ही साथ तिस-या टप्यात शिरून एकदम वेगाने लाखो लोकांपर्यंत पसरली तर त्यापैकी सुमारे १० टक्के गंभीर रूग्णांना दाखल करण्याइतकी इस्पितळे त्यात पुरेशा आय. सी. यू मधील खाटा हे सर्व आपल्याकडे नाही. एका जिल्हयात २० लाख लोकसंख्या असते. त्यातील ३० वर्षावरील  लोकसंख्या १० लाख असते. त्यातील एक चतुर्थांश म्हणजे २.५ लाख लोकांना करोना आजार झाला तर त्यातील १० टक्के म्हणजे २५ हजार लोकांना इस्पितळात ठेवावे लागेल. याच्या १० टक्के सुध्दा खाटा सरकारी रूग्णांलयांमध्ये आज नाहीत. दुसरे म्हणजे बहुतांश जनतेला हॉस्पिटलमधील उपचार मोफत मिळाले तरच ते हे उपचार घेऊ शकतील. पण गेल्या ४० वर्षातील खाजगीकरणाच्या धोरणामुळे आपल्या सार्वजनिक आरोग्य- व्यवस्थेची पडझड झाली आहे. त्यामुळे रूग्णांचे काय होणार हा मोठा  यक्ष प्रश्न आहे. 


अर्थात या साथीचा घाबरून जावून धसका न घेता ही साथ जास्त पसरणार नाही यासाठी आटोकाट प्रयत्न करायची गरज आहे. हे लक्षात घेता नागरिकांनी, आरोग्य –व्यवस्थेने आणि सरकारने कोणती पावले उचलायला हवी हे आपण पाहूया. नागरिकांनी वैयक्तिक पातळीवर घ्यायच्या काळजी बाबत शेवटी दिलेली चौकट पहावी. 



सरकारचे धोरण


या साथीला तोंड देण्यासाठी सरकारने लगेच जी पावले उचलली त्याचे आम्ही स्वागत करतो . – करोना ग्रस्त देशातून आलेल्या प्रवाशांची विमानतळावरच छाननी लगेच सुरू करणे , त्यांनी १४ दिवस घरीच थांबावे आणि इतर सर्वांपासून अलग रहावे असा सल्ला त्यांना देणे, त्याचा पाठपुरावा करून त्यांच्या पैकी ज्यांना नंतर ताप- खोकला आला त्यांच्या घशातील स्रावाची तपासणी करणे, ज्यांच्या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला त्यांना इतरांपासून अलग ठेवण्यासाठी त्यांना खास कक्षामध्ये दाखल करून सरकारी खर्चाने गरजेप्रमाणे उपचार करणे, त्यांच्या संपर्कात आलेल्यांना भेटून त्यांच्या घशातील स्रावाची तपासणी करणे इ. सर्व गोष्टी सरकारी आरोग्य व्यवस्थेने नेटाने केल्या आहेत. त्यामुळे अशा व्यक्तींपासून ही साथ पसरण्याला चांगला आळा बसला आहे हे स्वागतार्ह आहे. शाळा, महाविदयालये पासून अधिकाधिक प्रमाणात सार्वजनिक संस्था व आस्थापने ३१ मार्च पर्यंत बंद करण्याचा आदेश देणे हेही स्वागतार्ह आहे. पुण्यासारख्या ठिकाणी दुकानदार , हॉटेल मालक यांनी आपणहून ३ दिवस व्यवसाय बंद करायचे ठरवले तेही स्वागतार्ह आहे. 


पण हे पुरेसे नाही. जगात फक्त चारच देशांमध्ये या साथीला रोखण्यात यश आले आहे. – चीन, द. कोरिया , तैवान, सिंगापूर त्यांनी हे यश कसे मिळवले हे समजावून घेउन ताबडतोबीने आपण आणखी काही सुयोग्य पावले टाकायला हवीत. या चार देशांमध्ये खालील दोन मुख्य पावले पूर्ण ताकदीने उचलली आहेत की जी इतर देशांमध्येही काही प्रमाणात उचलली गेली आहेत. 


मोठया प्रमाणात नागरिकांच्या घशातील स्रावाची तपासणी  
एक तर या देशांमध्ये करोनाची लागण कोणाला झाली आहे का ते शोधण्यासाठी खूप मोठया प्रमाणात नागरिकांच्या घशातील स्रावाची तपासणी केली जाते. ज्यांची तपासणी केली जाते असा एक गट म्हणजे करोना- बाधित देशांमधून, करोना – बाधित प्रदेशातून आलेल्या व्यक्ती. करोना – ग्रस्त देशांतून या देशांमध्ये आलेल्या अशा लोकांना ताप आहे का ते विमानतळावर बघितले जाते. ताप- खोकला असेल तर त्यांना वेगळे काढून त्यांच्या घशातील स्रावाची तपासणी करून त्याचा रिपोर्ट निगेटीव्ह आला तरच त्यांना घरी जाऊ दिले जाते. बाकिच्या अशा बाधित देशातील सर्व प्रवाशांचा १४ दिवस पाठपुरावा केला जातो. त्यापैकी कोणाला नंतर खोकला ताप आला तर त्यांचीही तपासणी केली जाते. ती पॉझिटिव्ह आली तर त्यांना इतरांपासून वेगळे करून १४ दिवसात विलगीकरण कक्षात ठेवले जाते. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी केली जाते व ज्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येईल त्यांनाही १४ दिवस विलगीकरण (Isolation) कक्षात ठेवले जाते. असे केल्यामुळे सर्व आयात –जन्य केसेस हुडकल्या जाऊन, त्यांच्यावर उपचार करून त्यांच्यापासून होणारा प्रसार रोखला जातो आहे. 
याशिवाय या चार देशांमध्ये आणखी एक गोष्ट केली जाते. खोकला- ताप असलेल्या सर्व रूग्णांच्या घशातील स्रावाची घरोघर जाऊन तपासणी केली जाते. ती पॉझिटीव्ह आली तर त्यांच्या संपर्कातील सर्वांची तपासणी केली जाते. तसेच इतर निकष वापरून इतर अनेक नागरिकांची तपासणी केली जाते. त्यामुळे फक्त आयात- जन्य करोना –रूग्णच नव्हे तर स्थानिक, समाज- जन्य रूग्णही हुडकले जातात. त्यांच्यावर उपचार केले जातात आणि त्यांना १४ दिवसात विलिगिकरण कक्षात ठेवले जाते. 
भारतात मात्र आतापर्यंत फक्त आयात – जन्य रूग्ण हुडकून त्यांच्यावर उपचार व त्यांचे विलिगीकरण एव्हढेच केले जाते. या धोरणात दोन तृटी आहेत.  
एक तर परदेशातून येणारे काही रूग्ण असे असतात की ज्यांना विमानातून उतरताना अजून ताप –खोकला सुरू झालेला नसतो. नंतर दोन- चार दिवसात येऊ लागतो. तो पर्यंत आपल्याला करोनाची लागण झाली आहे. हे त्या रूग्णालाही माहित नसते. खोकला –ताप सुरू झाल्याची माहिती त्यातील बहुसंख्य रूग्ण आपणहून आरोग्य अधिका-यांना देत नाहीत. त्यातील अनेकांच्या लक्षात येत नाही की आपल्याला करोना –आजार झाला आहे. त्यातील बहुसंख्य जणांना सौम्य आजार असल्याने ते नेहमीसारखे समाजात वावरतात आणि ते बरे होईपर्यंत त्यांच्या नकळत हे विषाणू दोन आठवडे पसरत राहतात. या आयात- रूग्णांपासून ज्यांना सौम्य आजार होतो त्यांनाही माहित नसते की आपल्याला करोना आजार झाला आहे. त्यामुळे तेही न कळत करोना विषाणू पसरवत राहतात. करोना – विषाणूचा प्रसार होण्याची अशी साखळी चालू राहते. या प्रक्रियेला करोनाचा कम्युनिटी –स्प्रेड म्हणतात सर्वच देशात कम्युनिटी- स्प्रेड होतो. 
दुसरी त्रुटी म्हणजे खोकला ताप सुरू होण्याआधीही काही जणांच्या श्वासातून थोडे विषाणू बाहेर पडतात. त्यांचा सगळयांचा नकळत गुप्तपणे प्रसार होतो. करोनाचा बहुतांश प्रसार रूग्णांच्या खोकण्यातून जे तुषार (droplets) बाहेर पडतात त्यातील विषाणु इतरांच्या श्वास –मार्गात गेल्याने होतो हे खरे असले तरी हा गुप्त प्रसारही काही प्रमाणात होतच असतो  हे सर्वच देशांमध्ये होते.  


सामाजिक अलगिकरण
वरील  दोन प्रकारे होणारा करोनाचा कम्युनिटी- स्प्रेड (समाज – जन्य प्रसार) रोखण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे आपण सर्वांनी आपापल्या घरात रहायचे, समाजातील इतर सर्वांपासून काही आठवडे दूर रहायचे वरील चार देशात हा सामाजिक अलगिकरणाचा मार्ग पूर्ण ताकदीने अवलंबिण्यात आल्यामुळे तिथे ही साथ सध्या रोखली जाण्यात फार मोठी मदत झाली आहे. चीनमध्ये वूहान आणि काही शहरांमध्ये सर्व लोकांना दोन आठवडे अजिबात घराबाहेर पडायचे नाही असा आदेश सरकारने काढला व जबरजस्तीने राबवला. मात्र घरोघरी किराणामाल, दूध आदि पोहोचवले. तैवान, सिंगापूर, द. कोरिया या देशांमध्ये जबरदस्ती न करता स्थूलमानाने लोकशाही मार्गाने, लोकांना समजून सांगून, त्यांचे सक्रिय सहकार्य घेऊन हा मार्ग राबवण्यात आला. 
भारतात लोकशाही  चौकटीत राहून ज्या प्रमाणात हा सामाजिक अलगिकरणाचा मार्ग वापरला जाईल तितकी ही साथ आटोक्यात यायला सर्वात मोठी मदत होईल. मात्र भारतातील ९० टक्के जनता असंघटीत क्षेत्रात काम करते. सुट्टी घेऊन घरी बसायचे म्हणजे त्यातील बहुसंख्य लोकांना उपासमारीला तोंड द्यावे लागेल. त्यामुळे हा मार्ग काही प्रमाणातच वापरता येईल. तसेच तसे करताना कष्टकरी गरीब जनतेची उपासमार होणार नाही हेही कटाक्षाने पहावे लागेल. 


वरील सर्व गोष्टी लक्षात घेता, जन आरोग्य अभियानातर्फे आम्ही सरकारला खालील आवाहन करीत आहोत – 
१) करोना आजाराची लक्षणे व इतर निकष वापरून ज्या रूग्णांच्या घशातील द्रावाची तपासणी करावीशी डॉक्टरना वाटेल, त्यांची तपासणी सरकारी केंद्रामध्ये करण्याची व्यवस्था करा. सर्व डॉक्टर्सना याबाबत शास्त्रीय मार्गदर्शन सुचना पाळणे बंधनकारक करा 
२) खोकला- तापाच्या रूग्णांना प्राथमिक छाननीसाठी प्रवृत्त करणे, करोना रूग्णांच्या कुंटूबातील व इतर संपर्कातील व्यक्तींनी सरकारी आरोग्य –सेवेला सहकार्य करणे, यासाठी त्यांचा पाठपुरावा करणे या व अशा कामासाठी पुरेशा प्रशिक्षित आरोग्य- कर्मचार्यांची नेमणूक करा.
३) प्रत्येक जिल्हयामध्ये निरनिराळी सरकारी रूग्णालये अशी सक्षम करा की ज्यात पुरेशा खाटा, डॉक्टर्स आदि कर्मचारी, आय. सी. यु- खाटा व तज्ञ मार्गदर्शन उपलब्ध असेल व गंभीर करोना रूग्णांवर नीट उपचार करता येईल त्यासाठी येत्या काही महिन्यांमध्येच वेगवेगळया माध्यमातून अद्ययावत अधिकृत माहिती सरकारी रूग्णालये सक्षम करणे व काही नवीन बांधणे अशी पावले उचला. 
४) सरकारी दवाखाने, इस्पितळे इथे आणि वस्तीत काम करणा-या आरोग्य कर्मचार्यांना पुरेसे वैदयकिय मास्क व इतर खास वेष, निर्जंतुकीकरण करण्यासाठी रसायने इ. पुरेशा प्रमाणात पुरवा. 
५) जनतेला योग्य नेमकी माहिती पुरवणारी, त्यांच्या शंकाना उत्तर देणारी पुरेशी माहिती यंत्रणा उभारा . वेगवेगळया माध्यमातून अद्ययावत अधिकृत माहिती सोप्या भाषेत लोकांपर्यंत  पोहचवा. रोज आरोग्य – बुलेटीन प्रसूत करा. बिन- सरकारी सुत्रांनी माहिती पसरवण्यावर बंदी घालू नका. बिन सरकारी सुत्रांनी माहिती प्रसूत करताना त्याचा स्रोत हा सरकारी संस्था किंवा अधिकृत संस्था असाच असावा , ही अट ठेवून शास्त्रीय माहिती प्रसार करण्याच्या कामामध्ये संस्था- संघटनाना सामील करा. पारदर्शकता व सुयोग्य माहितीची सहज उपलब्धता हाच अफवांवरील उपाय आहे.  
६) गरज पडली तर COVID -१९ बाधित गंभीर रूग्णांवर उपचार करण्यासाठी , खाजगी इस्पितळातील काही खाटा व डॉक्टर्स, कर्मचारी सरकारी नियंत्रणाखाली आणण्याची तयारी करा .
७)  अशी पावले उचलण्यासाठी आरोग्यावरील सरकारी खर्च मोठ्या प्रमाणावर ताबडतोब वाढवा. तो राज्याच्या एकूण बजेटच्या ८ टक्के करा अशी तज्ञांची शिफारस आहे त्याची महाराष्ट्रात ताबडतोब अंमलबजावणी करा. 
८) सरकारी रूग्णालये व आरोग्य केंद्राचे होऊ घातलेले खाजगीकरणाचे सर्व प्रस्ताव पूर्णपणे मागे घ्या आणि त्याऐवजी सरकारी हॉस्पिटल, आरोग्य सेवा बळकट करा. 
९) अंगणवाडी, मध्यान्ह – भोजन योजना इ. मार्फत मिळणारा पूरक आहार बंद होणार नाही अशी व्यवस्था करा. 
१०) या साथीला रोखण्यासाठी सरकारी व खाजगी आस्थापने बंद केली तर  ही पगारी सुट्टी असेल असे जाहिर करा. काम बंद झालेले  रोजंदरीवरील मजूर, मनरेगा मधील मजूर यांच्यासाठी बेकार भत्ता लागू करा. जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा रास्त भावात होईल यासाठी व्यवस्था करा. 
११) ज्या भागात पूर्ण शट डाऊन करावे लागेल अशा भागात पिवळया व केशरी रेशन कार्ड धारकांना मोफत रेशन द्या.


करोना – साथीमध्ये नागरिकांनी घ्यायची काळजी 
विषाणूंच्या प्रसाराला आळा
रूग्णांच्या खोकल्यामार्गे बाहेर पडणा-या तुषारांमध्ये (Droplet) हे विषाणू असतात.मुख्यत: या तुषारांमार्फत या विषाणूंचा इतरांना संसर्ग होतो. खोकताना रुग्णाच्या तोंडासमोर रूमाल, मास्क नसेल तर खोकल्याचे तुषार समोरच्या व्यक्तीच्या नाकात जाऊन त्यामार्फत विषाणू थेट श्वासामार्फत शिरतात. तसेच हे खोकल्याचे तुषार ,त्यातील विषाणू जवळपासच्या वस्तूंवर पडतात. तिथून ते इतरांच्या हाताला लागतात. तो हात नाकाला, चेह-याला लागला तर त्यातून ते श्वासामार्गात शिरतात.


हे लक्षात घेता खालील काळजी घ्यावी. 
१) खोकला कशामुळेही असो खोकताना पटकन आपल्या हाताचा कोपरा नाकाजवळ आणून दंडावरील बाही तोंडासमोर धरावी किंवा रूमाल नाका- तोंडासमोर धरावा, रूमाल रोज धुवावा. 
२) वारंवार, विशेषत:  बाहेरून घरी आल्यावर हात साबणाने निदान वीस सेकंद धुवायचे, चेहरा धुवायचा अशी सवय लावून घ्यावी. ऑफिसेस , दुकाने इ. ठिकाणचे पृष्टभाग रोज सकाळ ,दुपार, संध्याकाळ जंतुनाशक डेटॉलसारख्या औषधी पाण्याने पुसून घ्यावे. 
३) हात चेह-याला लागणार नाही याची काळजी घ्यायची सवय जाणीवपुर्वक आजपासून लावून घ्यावी. 
४) हस्तांदोलन करण्याऐवजी हात जोडून नमस्कार करावा. 
५) घशात शिरलेले विषाणू  धुवून टाकण्यासाठी गरम पाण्याचे घोट घ्यावे, गुळण्या कराव्या. 


मास्क वापरावा का ?
कोणत्याही मास्कने करोना व्हायरस गाळले जात नाहीत. पण त्याला काही प्रमाणात अटकाव होतो. कारण करोना –व्हायरसचा प्रसार खोकल्यातून बाहेर पडणा-या तुषारांमार्फत होतो आणि या तुषारांना मास्कमुळे अटकाव होतो. N- 95 नावाच्या महागडया मास्कनेही करोना व्हायरस गाळला जात नाही पण तुषारांना जास्त प्रमाणात अटकाव होतो. डॉक्टरादी लोकांसाठी हे मास्क राखीव ठेवावे. करोनाच्या संशयित तसेच खात्री झालेल्या रूग्णांनी साधा मास्क लावला पाहिजे म्हणजे त्यांच्या खोकल्यातून बाहेर पडणारे तुषार जास्त पसरणार नाहीत. इतरांनी कोणताही मास्क लावायची सध्या गरज नाहीय. साथ सुरू झाली तर साध्या मास्कचा उपयोग एव्हढाच आहे की कोणी तुमच्या समोर खोकले की त्याचे तुषार थेटपणे तुमच्या नाकात जाणार नाहीत. मास्क, रूमाल स्वच्छ धुतलेला हवा, धुतलेल्या हाताने मास्क  लावावा, नंतर मास्कला, रूमालाला हात लावू नये. नाहीतर उलटा परिणाम होईल. रस्त्यातून चालताना, वाहन चालवताना मास्क घालून उपयोग नाही कारण रूग्णाशी घनिष्ट संपर्क आला तरच विषाणू लागण होते. 


करोना – खोकला- ताप झाल्याची शंका केव्हा घ्यायची?  
कोरडा खोकला व जोरदार ताप असा त्रास झाला तर घरी न बसता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ज्यांनी करोना- तापाची साथ असलेल्या देशातून, भागातून प्रवास केला असेल किंवा ज्यांचा रूग्णांशी घनिष्ट संपर्क आला असेल. (दोन मीटरच्या आतील अंतर, १५ मिनिटापेक्षा जास्त संपर्क) त्यांच्या घशातील स्रावाची करोना- विषाणू बाबत तपासणी करायला हवी. सरकारी दवाखान्यात ती मोफत होते. तपासणीचा रिपोर्ट निगेटिव्ह येईपर्यंत  घराबाहेर जाऊ नये, विश्रांती घ्यावी. करोना रूग्ण व कुटुंबीय यांनी घ्यायची काळजी याबाबत डॉक्टरी सल्ला पाळावा. 


करोना- खोकला- तापावर काय उपचार आहेत ? 
कोणत्याही औषधाने करोना विषाणू मरत नाहीत. पूर ओसरण्याची वाट बघावी लागते तसे शरीर या विषाणूंवर विजय मिळवण्याची वाट पहावी लागते. तोपर्यंत विश्रांती, तापावर गोळया, गरज लागल्यास कृत्रिम श्वासाची व्यवस्था असे उपाय करतात. 


करोना- साथीवर लस नाही का ?
नाही. संशोधन चालू आहे. लस तयार होऊन त्यावर निरनिरीळया चाचण्या होऊन करोना लस बाजारात यायला एक – दीड वर्ष लागेल. 
                                                                                आपले,


जन आरोग्य अभियान
डॉ. अनंत फडके- ९४२३५३१४७८


अभय शुक्ला – ९४२२३१७५१५


डॉ. सुहास कोल्हेकर – ९४२२९८६७७१


काजल जैन – ९९७०२३१९६७


शैलेजा आराळकर- ९४२३०१७३१७