लॉकडाऊनला कडाडून विरोध करत हजारोंचा जमाव वांद्रे रेल्वे परिसरात जमला


मुंबई - वांद्रे स्टेशनच्या बाहेर हजारोंचा जमाव मोठ्या संख्येने जमला आहे. लॉकडाउनचा विरोध करत अनेक कामगार हे गावी जाण्यासाठी हटून बसले आहेत. हजारो लोकांनी जमून गावी जाण्यासाठी गाडी सोडण्याची मागणी केली.


लॉकडाउनची मुदत आजच वाढवण्यात आली आहे. मात्र लोकांचा संयम सुटल्याचे यामध्ये दिसून आले. वांद्रे स्टेशनबाहेर हजारो लोक जमून लांब पल्याची गाड़ी सोडण्याची मागणी करत होते. आजूबाजूच्या कारखान्यांमध्ये काम करणारे हे कामगार असून अधिकतर यूपी, बिहारचे होते. पोलिसांनी सध्या जमाव पांगवला आहे.


पोलिसांनी हा जमाव पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार केला. ही घटना काही वेळापूर्वीच घडलेली असून आता पोलिसांनी वांद्रे येथील जमाव पांगवला आहे. या सगळ्या जमावामध्ये रोजंदारीवर काम करणारे कामगार या ठिकाणी जमले होते. लांब पल्ल्याची गाडी सोडा अशी मागणी या सगळ्या कामगारांनी आणि मजूर वर्गाने केली. पोलिसांनी सौम्य लाठीमार करत हा सगळा जमाव पांगवला आहे. महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी या सगळ्यांची समजूत काढली. वांद्रे पश्चिम या ठिकाणी ही घटना घडली. 


वांद्रे बेस्ट बस डेपोजवळ अनेक लहान मोठे कारखाने आणि फर्निचरची दुकानं आहेत. या दुकानांमध्ये काम करणारे मजूर आणि कामगार हे गावी जाण्यासाठी या ठिकाणी जमले होते.


अखेर या सगळ्या गोष्टी सहन न झाल्याने गावी जाण्यासाठी वांद्रे स्टेशन बाहेर हजारोंच्या संख्येने कामगार वर्गाने गर्दी केली होती. आम्हाला आमच्या घरी जायचं आहे ही मागणी त्यांनी केली आणि त्यासाठी विशेष ट्रेन सोडा अशीही मागणी त्यांनी केली होती.