पंतप्रधान आवास योजने अंतर्गत ठाणे आणि परिसरात १ लाख घरे बनू शकतील - फडणवीस


ठाणे : मुख्यमंत्री म्हणून चांगलं काम केलं आता विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेत आहे तर जनतेचा वकील म्हणून ताकदीने  काम करून जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू असं वक्तव्य विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यात केलं. आमदार संजय केळकर आणि ठाणे जिल्हा हॉसिंग फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राम गणेश गडकरी रंगायतन येथे रविवारी गृहनिर्माण संस्थांचा मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना फडणवीस यांनी वरील वक्तव्य केलं. 


पंतप्रधान आवास योजने अंतर्गत ठाणे आणि परिसरात १ लाख घरे बनू शकतील हि घरे खऱ्या अर्थाने सर्वसामान्य लोकांना परवडणारी घरे आहेत. आता सरकार बदललं असल्याने त्यांची याबाबत काय भूमिका आहे याची मला माहिती नाही. यासंदर्भात अजून तरी नवीन  सरकारने  इतर निर्णयाप्रमाणे स्थगिती दिली नाही. मला विश्वास आहे कि हे सरकार या योजनेला स्थगिती देणार नाही असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी लगावला. कोणता मजला कोणी घेतला असेल या बद्दल मला कसलीच चिंता नाही किंबहुना मला कोणता मजला कधी मिळेल अशी आशा धरूनही बसलो  नाही आम्ही जनतेच्या न्यायालयात  जाणारी लोक आहोत.  जनता हीच खरी सर्वोच्च न्यायालय आहे. ते जो निर्णय देतात त्याला धरून चालणारी आपण सर्व लोक आहोत, असं  फडणवीस यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं मला विश्वास आहे कि आपण चांगलं काम करून जनतेच्या न्यायालयात गेलं कि ते योग्य न्याय निवडा करतात . यापूर्वी २०१९ ला आपण जनतेच्या न्यायालयात गेलो तेव्हा त्यांनी आपल्या पारड्यात माप टाकून सत्तेच्या जवळ नेऊन बसवलं होत. पण काही कारणास्तव सत्ता बसली नाही. असं फडणवीस पुढे म्हणाले, पण परत जेव्हा आपण जनतेचा आशीर्वाद मागायला जाऊ तेव्हा ते मागच्या पेक्षा चांगला आशीर्वाद आपल्या पारड्यात टाकतील असा विश्वास यावेळी फडणवीस यांनी व्यक्त केला. आता मी ज्या विरोधी पक्षनेत्यांच्या भूमिकेत आहे त्याला पूर्णपणे न्याय देऊन त्यामाध्यमातून जनतेच्या समस्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन असं आश्वासन त्यांनी यांनी यावेळी दिलं. पुनर्विकासाच्या प्रश्नाबाबत मी मुख्यमंत्री असताना अनेक  लोक माझ्याकडे तक्रारी घेऊन यायचे. मी त्यांच्या तक्रारी ऐकून घायचो. पण त्यावेळी मला पण हतबलता जाणवायची मी त्यांना केवळ दिलासा देऊ शकत होतो. कारण त्यावेळी कायद्याची तरतूद माझ्या हातात नव्हती. मी माझ्या मुख्यमंत्री पदाच्या काळात एक पध्द्त ठेवली होती कि त्या त्या विषयात काम करणाऱ्या व्यक्तींनाच यात सामावून घेतलं होत. त्यातूनच असं उत्तम धोरण तयार होत असे. याचाच भाग म्हणून अशा जाणकार मंडळींना बरोबर घेऊन स्वयंपुनर्विकासाबाबत नियम तयार करण्यात आले असं फडणवीस पुढे म्हणाले किंबहुना आमच्या काळात नगरविकास विभागाने जे काम केलं तस काम मागील तीस वर्षात झालं नव्हतं असंही फडणवीस यांनी सांगितलं गेल्या पाच वर्षात वेगवेगळे गृहनिर्माण बाबत चांगले निर्णय झाले आहेत.


क्लस्टरची योजना केल्यानंतर त्यात विविध बदलही आपण केले. लोकांचा विचार करून नियमावली तयार केली असंही फडणवीस यांनी पुढे सांगितलं तब्बल अडीच वर्ष याबावर अभ्यास केला गेला असंहि फडणवीस यांनी सांगितलं. यावेळी व्यासपीठावर खासदार विनय सहस्त्रबुध्दे आमदार संजय केळकर निरंजन डावखरे भाजपा महिला मोर्च्याच्या माधवी नाईक ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सिताराम राणे आधी उपस्थित होते. 


या मेळाव्यात बोलताना राज्यसभेचे भाजपा खासदार विनय सहस्त्रबुद्धे म्हणाले कि ३० ते ४० वर्षानंतर इमारती जमीनदोस्त करून नवीन बांधण्याची वेळ येते. पण राजकारणात कधी तरी तीन ते चार महिन्यातच पुनर्विकास करण्याची गरज निर्माण होते. अनेकदा जनादेशाची जमीन कोणीतरी दुसराच बळकातो. तिथे  नवीनच माणूस घुसतो. आणि वैचारिकतेचा कोणताही पाया न घालता इमारत उभी केली जाते. इमारत चकचकीत दिसावी अशी रचना करून वरचा मजला मलाच पाहिजे अशी आडमुठेपणाची भूमिका घेतली जाते. तीन, चार महिन्यात भुसभुशीत जमिनीवर उभी केलेली इमारत खिळखिळी झाली आहे. जनादेशाची जमीन पुन्हा मिळावी आणि सर्व पद्धतीने पुनर्विकास राजकारणाचा व्हावा, जमीन मूळ मालकाला मिळावी अशी जनतेची इच्छा असल्याचा टोला राज्य सरकारला नाव न घेता खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी यावेळी लगावला
चोकट / दरम्यान सामना वर्तमानपत्राच्या संपादकपदी रश्मी ठाकरे यांची निवड झाली याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता त्यांनी याबाबत बोलणे टाळले