दगदुशेठ गणपती ट्रस्टतर्फे पुरंदरमध्ये 'जलदान'


पुणे - श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने पुरंदर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना दोन टँकर्सद्वारे ‘अमृतजल’ योजनेतून पाणीपुरवठा केला जात आहे.


यंदा टंचाईग्रस्त गावांमधील दुर्गम भागातही पाणीपुरवठा केल्याने अनेक वन्य जीवांची तहान भागली आहे. तसेच वागदरवाडी ग्रामपंचायत, रणनवरेवाडी, मौजे नावळे आदी टंचाईग्रस्त गावांमधील वाड्या-वस्त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे तालुक्यातील गावांना ऐन उन्हाळ्यात मोठा दिलासा मिळाला आहे. टँकर चालकही येथील टंचाईग्रस्त भागांची नेमकी माहिती घेऊन त्या ठिकाणी पाणी पुरवत आहेत.


पुरंदर तालुक्यातील टंचाईग्रस्त पिंगोरी गांवात ट्रस्टच्या वतीने जलसंधारण योजना राबविण्यात आली आणि ते गांव पाण्याबाबत स्वयंपूर्ण करण्यात आले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंगोरी येथील कामाची पाहणी केली आणि समाधान व्यक्त केले होते.सन २०१३ पासून अमृतजल योजने अंतर्गत ट्रस्टतर्फे दोन टँकर्स तालुक्यासाठी कायमस्वरूपी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.