लॉकडाऊनमध्ये राष्ट्रवादी पुरवणार नागरिकांच्या दारात स्वस्त दरात कांदे-बटाटे


ठाणे : गृहनिर्माण मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी ठाणेकरांच्या दारामध्ये स्वस्त दरात कांदे आणि बटाटे यांचा पुरवठा करण्याचा उपक्रम सुरु केला आहे. 


ठाणे शहरामध्ये कोरोनाचे अकरा रुग्ण सापडले आहेत. सध्या भारत कोरोनाच्या तिसर्‍या टप्प्यात जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये, अशा सूचना सरकारने केल्या आहेत. तरीही जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी लोक घराबाहेर पडत आहेत. पर्याय नसल्याने नागरिकांना घराबाहेर पडावे लागत असल्याने गृहनिर्माण मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी नाशिक येथील शेतकर्‍यांकडून कांदा आणि बटाटे यांची खरेदी करुन तीन किलो बटाटे आणि 2 किलो कांदे यांची एकत्रीत पिशवी थेट ग्राहकांपर्यंत पोहचविण्यास सुरुवात केली आहे. आज बाजारामध्ये कांदा 30 तर बटाटे 40 रुपये दराने विकले जात आहेत. तर, राष्ट्रवादीच्या वतीने साधारणपणे 180 रुपयांच्या या वस्तू अवघ्या 100 रुपयांमध्ये पोहचविल्या जात आहेत. 


मंगळवारी दुपारी 12 वाजेपासून हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. आज राष्ट्रवादीचे कोपरी-पाचपाखाडी  विधानसभाध्यक्ष नितीन पाटील, ब्लॉक अध्यक्ष समीर पेंढारी, रत्नेश दुबे, निलेश कदम, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विधानसभाध्यक्ष दीपक पाटील, युवक ब्लॉक अध्यक्ष रोहत भंडारी, वॉर्ड अध्यक्ष सुमीत गुप्ता , हॉकर्स सेलचे अध्यक्ष सचिन पंधारे आदी पदाधिकार्‍यांनी कांदे-बटाटे यांच्या पिशव्या विविध सोसायट्यांमध्ये पोहचत्या केल्या. राष्ट्रवादीच्या या उपक्रमास नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. शहराच्या विविध भागांमधून दूरध्वनीद्वारे कांदे-बटाट्यांची मागणी करण्यात येत आहे.  
या संदर्भात राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी सांगितले की, कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. अशा स्थितीमध्ये नागरिकांनी आपल्या घरातच राहणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळेच मागणी करणार्या प्रत्येक सोसायटी, गृहसंकुल, विभाग यांच्या दारात कांदे-बटाटे पोहचविण्यात येणार आहे. ज्यांना कांदे-बटाटे हवे असतील त्यांनी +91 93218 08021, 022-25386464, 022-25386565 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही परांजपे यांनी केले आहे.