भारतीय रेल्वेची प्रवासी सेवा ३ मे पर्यंत बंदच राहणार


नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना लॉकडाऊनची मुदत तीन मेपर्यंत वाढवण्याचे घोषित केले आहे. भारतीय रेल्वे बोर्डने सुद्धा रेल्वेची प्रवासी वाहतूक ३ मेपर्यंत बंद ठेवणार असल्याचे स्पष्ट केले आहे, तर जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी फक्त मालगाड्या सुरू राहणार आहेत.


भारतीय रेल्वे बोर्डाकडून काढण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, कोविड -19 च्या  उपाययोजनांच्या अनुषंगाने भारतीय रेल्वेच्या सर्व प्रवासी रेल्वे सेवा म्हणजेच सर्व मेल, एक्स्प्रेस
(प्रीमियम गाड्यांसह) रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवासी गाड्या, मेट्रो रेल्वे, कोलकाताच्या उपनगरी गाड्या व गाड्यांची मुदत ३ मेपर्यंत वाढविण्यात येणार आहे. तसेच रद्द केलेल्या गाड्यांसाठी प्रवाशांना संपूर्ण परतावा देण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे रेल्वे बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन व सार्वजनिक सुरक्षेचा विचार करून रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्याची घोषणा योग्य वेळी केली जाईल. पुढील माहिती येईपर्यंत कोणतीही आगाऊ आरक्षणे केली जाणार नाहीत. तसेच फ्रेट आणि पार्सल ऑपरेशन्स सध्या चालूच राहणार आहेत. या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची सूचना झोनल रेल्वेला देण्यात आली आहे.